Sunday, March 1, 2009

नक्षत्राचे देणे

गेल्या काही दिवसांत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. त्यांत त्यांनी 'गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे' या गाण्यावर फार सुंदर विवेचन केले. हे गाणे कै. चिं. त्र्य. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेले आहे. पंडितजींचे असे सांगणे होते की ज्या लोकांत काही कला आहेत - गाणे, काव्य, चित्रकला, हे सगळे देवाघरचे देणे आहे. अब्जावधी लोकांमधून एक लता मंगेशकर असते. कोट्यावधी लोकांमधून एक खानोलकर असतात. या कला घेऊन आपण त्याचे चीज करावे. पण या कलांचे देणे घेऊन सगळ्यांनाच परमेश्वराची इच्छा पुर्ण करता येईल असे नाही. या कवितेत हाच भाव प्रकट केला आहे. देवा, तू मला हे नक्षत्राचे देणे दिलेस, पण आता माझ्याजवळ काय आहे ? तर केवळ थोड्या कळ्या आणि ओली पाने. मी जगायला आलो होतो फक्त काही श्वास - असे म्हणतात की माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याने किती श्वास घ्यायचे हे ठरलेले असते. हे श्वास घेऊन झाले की, त्याने शरीर सोडून जायचे. पण आता मी थकलो. आणि हे देणे मला ओझे वाटते आहे. मनाचा दगड झालेला आहे - काही ओलावा राहिलेला नाही. आणि आता या कळ्यांचाही निर्माल्य झाले आणि पानांचा पाचोळा झाला - आता देवा, मी तुला काय देऊ ? कै. चिं. त्र्य. खानोलकर यांचीही शोकांतिका त्यांनी सांगितली. एव्हढा प्रतिभावान साहित्यिक पण जगण्यासाठी फार कष्ट करायला लागले. महाराष्ट्रात कवी किंवा साहित्यिक केवळ लेखणीवर जगू शकत नाहीत. खानोलकरांनी चपराशाची नोकरी केली - ते ही कै. पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकरांचा वशिला असल्यामुळे. त्यांच्या कित्येक कवितांना पंडित मंगेशकरांनी अतिशय सुंदर चाली दिल्यात. हे नक्षत्राचे देणे कुणाला मिळेल हे केवळ परमेश्वरच ठरवतो. कै. दिनानाथ मंगेशकरांना जरूर वाटले असेल की आपल्या सगळ्या मुलांना छान गाणे यावे - सगळ्यांना हे देणे मिळावे - परन्तु पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे लता मंगेशकर यांना हे देणे मिळाले आहे. (आम्ही विचार करतो की या देण्याचा एक कण जरी आमच्यावर पडला तरी ते या जन्मासाठी पुरे आहे). हे तर सर्व गंधर्वांचे कुटुंबच आपल्या समोर आले आहे - आपले जीवन त्यांच्या जीवनकाळात आपल्याला जगायला मिळते हे आपले केव्हढे भाग्य.
पंडितजींनी ज्ञानेश्वरांचेही ऊदाहरण दिले. विठ्ठलपंतांची चार मुले - निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता. त्यांनाही वाटलेच असेल की सर्वांनी प्रतिभाशाली व्हावे. पण देवाने ज्ञानेश्वरांना देणे दिले - आणि एव्हढे दिले की केवळ वयाच्याएकविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व भावंडांना मिळून पुरून ऊरेल एव्हढि निर्मिती केली. पण हेही खरेच की देवाचे देणे ज्ञानेश्वरांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहीले आणि पुरेपूर परत केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात अजूनही तीच जादू आहे. शिवाय स्वरांवर व तालावर कमालीची हुकूमत. त्यांनी कितीतरी ऊदाहरणे दिली की कवीची कविता घ्यावी, कविबरोबर चर्चा करावी आणि मग त्या कवितेला जणू साज चढवून अधिक देखणे करीत चाल लावावी. स्वातंत्र्यवीर सावरकर असेच एक देणे लाभलेले. यांना तर परमेश्वराने हात आखडता न घेता भरभरून प्रतिभा दिलेली. आणि आपण त्यांना विसरतो आहोत. त्यांचे 'सागर प्राण तळमळला' हे अप्रतीम कवन आणि पंडितजींनी त्याला लावलेली अत्यन्त उचित अशी अमर चाल म्हणजे अमृतयोग. माझ्या मनात असा विचार आला की खानोलकरांचे उदाहरण यांनी सांगितले - पण असे किती प्रतिभावान लेखक, कवि आपल्यापर्यंत पोचत नाहित ? खानोलकर यांना मदत करणारे - काही काळ का होईना, पण मिळाले. पण जे लोक मदतिपर्यंत न पोचताच बुडाले, त्यांचे हो काय ? आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत ? आपणच हे नक्षत्राचे देणे आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही आहोत ?

4 comments:

आशा जोगळेकर said...

असा कांही नक्षत्राचे देणे लाभलेल्या व्यक्ती आपल्या पहाण्यात आल्या तर आपल्या कडून होईल ते त्यांची प्रतिभा लोकां पर्यंत पोचेल ह्या करिता करावे .

आशा जोगळेकर said...

हे नक्षत्रांचे देणे ब-याच जणांना लाभते पण प्रसिध्दीचा योग सा-यांच्यच पत्रिकेत नसतो. किती तरी तारे जगाला ओळख न दाखवताच विझून जातात.

आशा जोगळेकर said...

खरंय । किती तरी असे उगवते तारे कुणाच्या नजरेस न पडताच विझून जातात ।

आशा जोगळेकर said...

क्षत्रं असतात हो बरीच पण सा-यांच्याच वा़ट्याला लखलख येत नाही । काही तर न उजळतांच विझून जातात.