Thursday, December 3, 2009

गंभीरची सुटी

व्यवसाय की परिवार या प्रश्नावर गौतम गंभीर याने अत्यंत विचारी (नावाप्रमाणे गंभीरपणे विचार करुन) निर्णय घेतला असेल. त्याने असा निर्णय घेतला की क्रिकेट कसोटी सामना न खेळता आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नाला जायचे.
खरे म्हणजे हा काळ त्याच्या खेळाचा अत्यंत कर्तुत्वाचा काळ. गेल्या दीड वर्षाच्या काळात गौतम गंभीर हा भारताच्या क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा व सातत्याने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याची भारतीय संघातली जागा निश्चित आहे. किंबहुना भारताला त्याच्या सारख्या संयत आणि निश्चयी खेळाडूची आवश्यकता आहे. त्याने असे असताना एक कसोटी सामना न खेळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला याचे नवल वाटते. त्याहीपेक्षा भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला सुटी मंजूर केली याचे जास्त नवल.
याहून पुढे जाऊन विचार करता असे वाटते की हा एक ऐतिहासिक निर्णय ठरावा. कारण कोणी भारतीय क्रिकेट संघातून असे कौटुंबिक कारण देऊन कसोटी सामना न खेळलेले ऐकिवात नाही. सुनील गावसकर हा एकटाच खेळाडू होता जो हे करू शकला असता. पण त्यानेदेखील खेळण्याचा निर्णय घेतला - तो जवळ जवळ ९० कसोटी सामने सलग खेळला. इतर खेळाडू देखील सामने खेळले नाहीत ते केवळ जखमी असल्यामुळे.
इतर काही खेळाडूंनी आपले कौटुंबिक समारंभ ज्या काळात क्रिकेट सामने नसतात अशा काळात उरकून घेतले आहेत. उदहरणार्थ लक्ष्मण, राहुल द्रविड, इत्यादी.

साहजिकच या निर्णयामागे धोनी असेलच. त्याने संमती दिल्याशिवाय गंभीर असे करणे शक्यच नाही. या जागी धोनीने दाखवले आहे की तो एका कुशल व्यवस्थापकही आहे. त्याचबरोबर त्याने असाही संकेत दिला आहे की तो एक असा संघ तयार करतो आहे ज्यात संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. यामुळे मुरली विजय या फलंदाजाला जवळ जवळ एका वर्षानंतर संधी मिळाली आहे. गेल्या वेळेसही गंभीरच्या जागेवरच विजयला संधी मिळाली होती.
बर्‍याच व्यवसायिकांच्या जीवनातही अशी वेळ येताच असेल की जेव्हा व्यवसाय की परिवार यांपैकी एक निवडणे आवश्यक होते. आपल्याला असे दिसते की परिवाराकड़े / कुटुम्बाकडे दुर्लक्ष केले जाते आणि व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. एका व्यावसायिकाचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारापासून दूर जात असतो. त्यातल्या त्यात एका यशस्वी क्रिकेटपटुचे जीवन हे धकाधकिचे. गंभीरने आपल्या परिवारालाही महत्व देऊन एक प्रकाराचा पायंडा पाडला आहे असे म्हणायला हरकत नाही.

Monday, November 23, 2009

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण या विषयावर बर्‍याच भाषेतील अगणित माध्यमातून असंख्य चर्चा, लेख, आरोप, प्रती-आरोप छापून आलेले आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक मुद्दा विसरला जातोय तो हा की सचिनचे म्हणणे होते की तो सगळ्यात आधी भारतीय आहे.


तो भारतीय संघात आहे - मराठी संघात नाही. तो मुंबई संघाकडून खेळतो - मराठी संघाकडून नव्हे.
त्याला मराठी असण्याचा अभिमान नक्कीच आहे पण ते त्याच्या खेळातील इर्षेचे कारण नव्हे. तो जेव्हा कुठल्याही क्रिकेट संघात असतो तेव्हा तो एक भारतीय खेळाडू असतो.
सचिनची कारकीर्द ही खेळाडूची आहे. क्रिकेट हे त्याने निवडलेले क्षेत्र आहे. त्याने क्रिकेटशिवाय दुसर्‍या कुठल्याही विषयावर भाष्य केलेले नाही. मग असे त्याच्या म्हणण्याचे राजकारणी भांडवल करण्याची काय आवश्यकता आहे?


बरे, मराठी म्हणून 'मराठी भाषा बोलता येते' या एका ओळखीशिवाय मराठी माणसाचा वेगळेपणाचा दुसरा काय मुद्दा आहे? फक्त महाराष्ट्रात राहतात म्हणून मराठी असे समजले जाते का? नाही. हा तर शिवसेनेचा आणि मनसेचा कळीचा मुद्दा आहे.
त्यांना जर मराठी माणसाला पुढे आणायचे असेल तर या सगळ्या राजकारणी / समाजकारणी पक्षांनी मराठी माणसांना कष्ट करायला शिकवावे. जसे सचिन तेंडुलकरने केले आहेत.
सचिनचे उदाहरण समोर ठेवून मराठी माणूस कष्ट करायला का तयार नाही? ५-१० वर्षे खस्ता खायला का तयार नाही?


काही पत्रकारांनी अशी खंत प्रकट केली आहे की इतर क्षेत्रांतील यशस्वी मराठी कार्यकर्त्यांची माहिती लोकांपुढे येत नाही. मग या पत्रकारांनी तसे कां करू नये? जे पत्रकार क्रिकेटबद्दल रकानेच्या रकाने भरतात, किंवा ज्यांचे पत्रकार मित्र असे लेख लिहितात, त्यांनी वेळीच असे लेखन थांबवून लोकोपयोगी लेखन कां करू नये?
काय म्हणता? आमची नोकरी जाईल? संपादकांनी सांगितले ते लिहावे लागते? मग असे बिनबुडाचे आरोप करतांना आणि लेख लिहितांना हे मधे नाही आले?
मराठीपणा जोपासणे ही सचिनची एकट्याची जबाबदारी नाही. जे लोक मराठी बोलतात, ज्यांना मराठीविषयी जिव्हाळा आहे त्या लोकांनी मराठीपणा पुढे न्यावा - तसे लोक जमा करावे. मराठी लोकांचा ऊत्कर्ष, यशस्वी लोकांचे कार्य पुढे आणावे.
मराठी लोकांची साथ करावी. एक मराठी पुढे चालला त्याला मागे ओढून मराठी लोकांचा उत्कर्ष होणार का? नक्कीच नाही. जो पुढे चालला त्याला म्हणावे हो पुढे - तुझ्या मागे आम्ही आणखी दहा मराठी पाठवतो.

बर्‍याच लोकांना कदाचित ठाऊक नसावे - राहुल द्रविड हाही मराठी भाषिकच आहे. त्याने काय म्हणावे अशी अपेक्षा आहे?

Wednesday, November 18, 2009

राहुल द्रविडची खेळी.

सचिन तेंडुलकरबद्दल जेव्हढे लिहिले, बोलले, ऐकले जाते त्यापेक्षा कितीतरी कमी राहुल द्रविडबद्दल चर्चा केली जाते. पण तरी राहुल सचिनयेव्हढाच खंबीरतेने खेळपट्टीवर पाय रोवून ऊभा असतो.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यातली त्याची खेळी अगदी अप्रतीम होती. त्याची आणि मुरलीधरनची जुगलबंदी अगदी सुंदर रंगली. आणि शेवटी राहुलने केवळ मुरलिधरनवरंच मात केली असे नव्हे तर युवराज आणि धोनीला देखील त्याने कसे खेळायचे हे दाखवून त्यांना श्रीलंकेच्या गोलंदाजांचे चेंडू कसे खेळायचे हे जणू खेळपट्टीवरंच शिकवले.

मला माझ्या डोळ्यासमोर अजूनही दिसते की, मुरलिने निरनिराळे चेंडू फेकून राहुलला चकविण्याचा, बाद करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू राहुल त्या कठीण चेंडूंना इतक्या हळूवारपणे खेळला की त्या चेंडूंमधला विखार विझून गेला.
मुरलीचे ओफस्पीन, दूसरा, फास्टर वन, हे सगळे चेंडू तो इतक्या लीलया खेळला. इतकेच नाही तर आपल्याभोवती असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या जाळ्यातून नजाकतीने चेंडू सीमापार पाठवला.

एव्ह्ढे असूनही त्याच्या मनात संघाचे विचार सुरू होते. स्वत:च्या धावांच्यापेक्षा संघाच्या किती धावा असायला ह्व्यात यांकडे त्याचे जास्त लक्ष्य होते.

असे खेळाडू कर्णधार धोनीबरोबर असताना त्याला फार काळजी असू नये.

Sunday, October 25, 2009

क्रिकेटचा आनंद

क्रिकेट या खेळाने खेळाडूंशिवाय किती तरी लोकांना आनंद दिलाय. किती लोकांच्या घरांत क्रिकेटमुळे चहातल्या कपात वादळे येऊन शांत झालेली आहेत. किती लोकांनी क्रिकेटवर लेखन करून इतरांना आनंद दिला आहे. किती लोकांनी त्या लेखनावर टीका करून त्याहून जास्त आनंद मिळवला आहे. तासन्तास क्रिकेटवर गप्पा मारलेल्या आहेत. आपल्याला क्रिकेटमधील कि हा र्‍हस्व की दीर्घ ही शंका असूनही खेळाडूंना त्यांचा खेळ कसा सुधरवता येईल यावर फुकटचे सल्ले दिलेले आहेत.

क्रिकेट हा कदाचित एकटाच खेळ असेल जो न खेळणारे हे खेळाडूंपेक्षा जास्त ज्ञानी असू शकतात (असे त्या ज्ञानी लोकांना वाटते). बरे, प्रत्येकाला वाटते की आपणच ते - आपलं ते मत .. बाकीच्यांची ती तोंडाची वाफ.
आता असे पहा की तुम्ही जी क्रिकेट मॅच पाहता आहात ती मॅच सगळेच पाहत आहेत. तुम्ही जर क्रिकइन्फोवर दिवसभर पडिक
असाल तर तेही असू शकतात. तुम्ही कुठले लेख वाचत असाल तर तेही काही वाचत असणार. मग असं असताना त्यांनी तुमची (वायफळ) बडबड का ऐकून घ्यायची ? हां, आता तुम्ही रवि शास्त्री असाल, आणि टी. व्ही. लावल्यावर जबरदस्ती तुमचा आवाज आणि मत ऐकावे लागणार असेल, तर ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही.

आणि रवि शास्त्री, सुनील गावसकर, लक्ष्मण शि., .. झालंच तर बॉयकॉट, इयान चॅपेल या लोकांची गोष्टच वेगळी आहे. आता फलंदाज बाद झाला हे कोण ठरवणार? पंच ? छे छे .. त्याचा काय संबंध ? जर या समालोचकांपैकी कोणाला जर (जवळ जवळ १०० यार्डांवरून) तो बाद आहे असे वाटले तरच. आणि यानंतर पंच जर यांच्याशी सहमत नसेल, तर ती पंचाची चूक. कारण हे तर सर्वज्ञानी, सर्वसाक्षी. पंच फलंदाजाच्या केवळ २२-२४ यार्ड दूर असेल, त्याला स्वच्छ दिसत असेल की या गड्याने आता बॅट सोडून घराचा रस्ता धरावा. पण, हे लोक कसं सांगणार, की अरेरे, काय या बिचार्याचे नशीब. केवळ खोटेपणाने याला परत जावे लागते आहे.
पण मग पुढे २ मिनिटांनी काय होते ? रिप्ले दिसतात. आणि यांचे पितळ ऊघडे पडते. दूध का दूध और पानी का पानी. मग काय त्या पंचाच्या तारिफीच्या मजल्यावर मजले चढतात. हाच तो जगातला सर्वोत्तम पंच! हा नसता तर ही मॅच वाया गेली असती.
पण जर का हा निर्णय चुकीचा निघाला, तर त्या पंचाच्या दुर्दैवाला पारावार नसतो. त्याने पैसे खाल्लेले असतात. तो पक्षपाती असतो. तो आन्तरराष्ट्रिय सामन्यात पंचगीरी करण्याच्या लायकीचा नसतो. त्याने सरळ दूध विकायचा धंदा सुरू करावा यावर या सर्वांचे एकमत होते.

पण प्रेक्षकांचे काय? ज्यांसाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे, त्यांना कोणी विचारते आहे का ? मैदानावर जाउन जे लोक मॅच पाहतात, ते खरे प्रेक्षक .. घरी बसू, आपल्या आरामखुर्चित बसून जे मॅच पाहतात, ते तर टी. व्ही. चा पडदा बघणारे लोक. ते खरे क्रिकेटचे रसास्वादी नव्हेत. अशा प्रेक्षकांच काय असतं की त्यांचा संघ हरायला लागला की हे चॅनेल बदलणार. खरा क्रिकेटमधे रस असणारा प्रेक्षक शेवटपर्यंत आपल्या संघाची बाजू सोडणार नाही. संघ हरो वा जिंको.
खरा क्रिकेटप्रेमी, पाऊस, वारा, ऊन, थन्डी आणि इतर गैरसोय हे सगळे सहन करून, मैदानावर जाऊन सामना बघणार.
त्याला मिळणारा आनंद तो खरा. त्याचे मत हे या सगळ्यांनी ऐकायला हवे.

Sunday, July 12, 2009

खेळ आणि व्यायाम

आपण आपल्या मुलांना खेळाची आणि व्यायामाची आवड निर्माण व्हायला काय करतो आहोत ?
मुले ही आपल्या आई वडिलांकडे पाहूनच त्यांचे अनुकरण करतात हे जरी खरे असले तरी प्रत्येक मुलाचा गुणधर्म वेगळा असतो.
म्हणजे खेळाडूचा मुलगा खेळाडू आणि व्यायामपटू बनेलच असे नाही पण कमीतकमी त्या मुलांना खेळाची तोंडओळख तर होईल.
काही मुलांना खेळाची बरीच आवड असते. अशा मुलांना जर बरोबर दिशेकडे वळवले तर ही मुले मोठी होऊन नक्कीच प्रवीण खेळाडू बनतील.

Sunday, March 1, 2009

नक्षत्राचे देणे

गेल्या काही दिवसांत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. त्यांत त्यांनी 'गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे' या गाण्यावर फार सुंदर विवेचन केले. हे गाणे कै. चिं. त्र्य. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेले आहे. पंडितजींचे असे सांगणे होते की ज्या लोकांत काही कला आहेत - गाणे, काव्य, चित्रकला, हे सगळे देवाघरचे देणे आहे. अब्जावधी लोकांमधून एक लता मंगेशकर असते. कोट्यावधी लोकांमधून एक खानोलकर असतात. या कला घेऊन आपण त्याचे चीज करावे. पण या कलांचे देणे घेऊन सगळ्यांनाच परमेश्वराची इच्छा पुर्ण करता येईल असे नाही. या कवितेत हाच भाव प्रकट केला आहे. देवा, तू मला हे नक्षत्राचे देणे दिलेस, पण आता माझ्याजवळ काय आहे ? तर केवळ थोड्या कळ्या आणि ओली पाने. मी जगायला आलो होतो फक्त काही श्वास - असे म्हणतात की माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याने किती श्वास घ्यायचे हे ठरलेले असते. हे श्वास घेऊन झाले की, त्याने शरीर सोडून जायचे. पण आता मी थकलो. आणि हे देणे मला ओझे वाटते आहे. मनाचा दगड झालेला आहे - काही ओलावा राहिलेला नाही. आणि आता या कळ्यांचाही निर्माल्य झाले आणि पानांचा पाचोळा झाला - आता देवा, मी तुला काय देऊ ? कै. चिं. त्र्य. खानोलकर यांचीही शोकांतिका त्यांनी सांगितली. एव्हढा प्रतिभावान साहित्यिक पण जगण्यासाठी फार कष्ट करायला लागले. महाराष्ट्रात कवी किंवा साहित्यिक केवळ लेखणीवर जगू शकत नाहीत. खानोलकरांनी चपराशाची नोकरी केली - ते ही कै. पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकरांचा वशिला असल्यामुळे. त्यांच्या कित्येक कवितांना पंडित मंगेशकरांनी अतिशय सुंदर चाली दिल्यात. हे नक्षत्राचे देणे कुणाला मिळेल हे केवळ परमेश्वरच ठरवतो. कै. दिनानाथ मंगेशकरांना जरूर वाटले असेल की आपल्या सगळ्या मुलांना छान गाणे यावे - सगळ्यांना हे देणे मिळावे - परन्तु पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे लता मंगेशकर यांना हे देणे मिळाले आहे. (आम्ही विचार करतो की या देण्याचा एक कण जरी आमच्यावर पडला तरी ते या जन्मासाठी पुरे आहे). हे तर सर्व गंधर्वांचे कुटुंबच आपल्या समोर आले आहे - आपले जीवन त्यांच्या जीवनकाळात आपल्याला जगायला मिळते हे आपले केव्हढे भाग्य.
पंडितजींनी ज्ञानेश्वरांचेही ऊदाहरण दिले. विठ्ठलपंतांची चार मुले - निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता. त्यांनाही वाटलेच असेल की सर्वांनी प्रतिभाशाली व्हावे. पण देवाने ज्ञानेश्वरांना देणे दिले - आणि एव्हढे दिले की केवळ वयाच्याएकविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व भावंडांना मिळून पुरून ऊरेल एव्हढि निर्मिती केली. पण हेही खरेच की देवाचे देणे ज्ञानेश्वरांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहीले आणि पुरेपूर परत केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात अजूनही तीच जादू आहे. शिवाय स्वरांवर व तालावर कमालीची हुकूमत. त्यांनी कितीतरी ऊदाहरणे दिली की कवीची कविता घ्यावी, कविबरोबर चर्चा करावी आणि मग त्या कवितेला जणू साज चढवून अधिक देखणे करीत चाल लावावी. स्वातंत्र्यवीर सावरकर असेच एक देणे लाभलेले. यांना तर परमेश्वराने हात आखडता न घेता भरभरून प्रतिभा दिलेली. आणि आपण त्यांना विसरतो आहोत. त्यांचे 'सागर प्राण तळमळला' हे अप्रतीम कवन आणि पंडितजींनी त्याला लावलेली अत्यन्त उचित अशी अमर चाल म्हणजे अमृतयोग. माझ्या मनात असा विचार आला की खानोलकरांचे उदाहरण यांनी सांगितले - पण असे किती प्रतिभावान लेखक, कवि आपल्यापर्यंत पोचत नाहित ? खानोलकर यांना मदत करणारे - काही काळ का होईना, पण मिळाले. पण जे लोक मदतिपर्यंत न पोचताच बुडाले, त्यांचे हो काय ? आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत ? आपणच हे नक्षत्राचे देणे आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही आहोत ?