Monday, November 3, 2008

अनिल कुंबळे रिटायर होतो

यात वाईट ते काय ? हे तर गेल्या एक वर्षापासून दिसत होत.
गैरसमज करून घेऊ नका. मला अनिल कुंबळे बद्दल अत्यंत आदर आहे आणि त्याच्या खेळावर प्रेमही.
मी कुंबळे गोलंदाजी करतो म्हणून रात्र जागून क्रिकेट मॅच पाहिली आहे.

कुंबळेच्या गोलंदाजी आणि इतरांच्या गोलंदाजीमधे फरक आहे तो अचूकतेचा. त्याच्या शेवटच्या कसॉटीमधल्या गोलंदाजीचे प्रुथ:करण पाहिल्यास कळेल की त्याने
सर्व इतर गोलंदाजांपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. पण तरीदेखील भारताच्या संघाला आवश्यकता आहे ती एका बळी घेणार्‍या गोलंदाजाची. नुसत्या धावा थांबवणार्या नव्हे.
तो इतके दिवस सन्घामधे होता कारण इतर गोलंदाज त्याच्या इतके अचूक नव्हते.
पण त्याचे हे सगळे गुण जरी मानले तरी असे दिसत होते की आता त्याला बळी मिळत नाहीत. शिवाय त्याची शारीरिक तंदुरुस्ती दिवसेन दिवस कमीच होत होती.
आणि त्यामुळे कुंबळे रिटायर झाला हे बरे झाले.

Monday, October 6, 2008

एका कॅंपची गोष्ट

आता हेच बघाना, आमची मुलगी ५ दिवसांच्या कॅंप ला गेली होती. तिच्या आईला वाईट वाटले - जणु काही ती वर्षभर दूर गेली होती. तर मला असे वाटले की छान मजा करून येईल ४-५ दिवस.आणि मुलीच्या स्वभावाप्रमणे ती नक्कीच मजा करून येईल.पण आईचे हृदय - ते आपल्या मुलांची काळजी नेहमीच करणार.
आईला इथे झोप नाही. मुलगी असेल तर तिच्यावर थोड्या-थोड्या वेळानी ओरडणार, नसेल तर तिची काळजी करणार.
आणि मुलगी ? तिला काय वाटले ? सुटले मी काही दिवस या आरड्याओरड्यातून. पण हे दोन दिवस. पुढे तोच आईचा ओरडा गोड वाटायला लागला.
बर, परत आल्यावर काय ? तर दोन मिनिटे दोघींनी मिठी मारली. पुढे आईचे रागावणे सुरू.
मुलगी पण त्याच चुका पुन्हा तशीच करते आहे.
कॅंपमधे मुलीचा दिवसभराचा कार्यक्रम आईशिवाय अत्यंत नीट प्रकारे सुरू होता असे कळले. मग तो आरडाओरडा कशाला ?
बर, मुलीने तरी आईने ओरडण्याची वाट कशाला पाहावी? गेले पाच दिवस स्वत:हून स्वत:चे काम केले ना ? मग आता
घरी आल्यावर त्यात बदल का झाला ?
आता झाले असे आहे की मुलीलाला माहिती आहे की काही जरी ती विसरली तरी आई आहेच, आणि आईला खात्री आहे की आपली मुलगी विसरणारच!

Tuesday, September 30, 2008

स्ट्रेस ? कसला स्ट्रेस ?

प्रेशर, टेन्षन, स्ट्रेस, दबाव,या सगळ्या गोष्टी आपल्या मनाचे खेळ आहेत. घटना त्याच असतात - पण वेगवेगळे लोक त्याच घटनांना वेगवेगळे तोंड देतात. काही खचून जातात तर काही खंबीरपणे उभे राहतात आणि त्या वाईट घटनांमधून काही चांगले घेऊन बाहेर पडतात.
मग दु:खी घटनांमधून चांगले कसे शोधायचे?
खरे तर या विषयावर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. सुखी कसे व्हायचे ? या प्रश्नावर तर सगळे बुवा आणि महाराज जगतात.
शिवाय असंख्य मनोरूग्ण वैद्य, तांत्रीक, मान्त्रीक, लेखक, वक्ते, प्रकाशक, आणि इतर अनेक सहायक उद्योगात असलेले लोक यावर जगतात.
एवढेच काय, नेते आणि राजे (म्हणजे राज्यकर्ते .. आडनाव नव्हे ते) यांचे अस्तित्वच या प्रश्नावर अवलंबून आहे. आपण त्यांना का
निवडून देतो ? त्यांनी लोकांना चांगले वाटावे, सुख वाटावे असे काही काम करावे म्हणून.
पण असे पहा की वाटणे हे आपल्या स्वत:वर अवलंबून आहे. आपल्याला काय वाटते हे कोणी कसे ठरवणार ?
प्रश्न पुढे असा की आपल्या मनावर आपला ताबा आहे का ?
मन म्हणजे तरी काय ? आपल्या मेंदूत चाललेले विचार. आपण कोण ? आपले विचार. आपल्या मनात / मेंदूत जर
काही विचार नसतील तर आपल्याला अस्तित्व आहे का ?
म्हणजेच हे सगळे आपल्या मनाचेच खेळ नाहीत का ? आपण जर त्यातले काही विचार / खेळ नाकारले, तर ऊरलेले
विचार हे आपल्याला हवे असलेले विचार आहेत. आणि हे विचार चांगले, सुखी विचार असतील तर आपल्याला
ताण कमी वाटेल.
तो ताण कमी करण्यासाठी लोक बरेच काही करतात. शारीरिक व्यायाम, वाचन, गप्पा, लिहीणे, चित्रकारी, आणि बरेच काही.
माझ्या मते कला हा प्रकार केवळ आपले मन गुंतवण्यासाठी, मनाला सतत कशात तरी गर्क ठेवण्यासाठी आहे.
आणि असे मन गुंतल्यामुळे, मनाला इतर दु:खद गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही.

Saturday, August 2, 2008

मैत्री

दोन दिवसांपूर्वीच आमच्या शेजारी रहायला विचार करणार्या एका कुटुम्बाची ओळख झाली.
आमच्या शेजारी एक घर विकायला काढले आहे. त्यांचा विक्री वकील हा आमचा मित्रच. त्यामुळे तो त्यांना आमच्याकडे घेऊन आला. आणि मग त्यांना ज़रा बरे वाटले असावे.
ते साहजिकच आहे. अनोळखी जागेची, कार्याची सगळ्यांनाच ज़रा भीती वाटतेच. धीर धरून उडी मारणारे त्यातल्या त्यात कमीच असतात. आमच्यासारखे . आम्ही म्हटले की आधी रहायला जाऊ आणि मग ओळखी होतीलच. तसे आजूबाजूचे सगळे समवयस्कच आहेत.

नवीन मित्र बनवणे हे फारसे कठीण नाही. आपण इतरांच्या बाबतीत उत्सुकता दाखवली तर त्यांना छान वाटणारच. आपल्याबद्दल कोणी चांगले बोलत असेल तर आपल्याला तो मनुष्य आपला वाटू लागतो.
पण हे लक्ष्यात ठेवायला पाहिजे की मैत्री ही दोन्हीकडून हवी. आपण कधीच कोणाचे जबरदस्ती मित्र होऊ शकत नाही. तसे असेल तर ती एक तडजोड असते.
मला सुरुवातीला आपले मित्र कोण हे कळायला जरा वेळ लागला. पण आता मला हे कळले आहे की वेगवेगळ्या क्रियांकरिता वेगळेच मित्र हवेत. एकाच मित्राकडून आपल्या सगळ्या कार्यांत सहभाग असणे ही अपेक्षा नैसर्गिक नाही.