Sunday, July 15, 2007

माझी पहिली आठवण

माझी पहिली आठवण आहे ती माझ्या आत्याबरोबर तिच्या (आणि माझ्याही) शाळेत जायची. मी तेव्हा बालकमंदिरात होतो.
शाळेचं नाव होतं परांजपे कॉन्व्हेंट.
माझी आत्या तिथे शिक्षिका होती. आम्ही आत्याच्याच घरात (बळवंताश्रम) भाड्यानी राहत होतो. मला मधेच वर्गात बसायचा कंटाळा आला की मी तिच्या वर्गात जायचो. मला स्पष्ट आठवतं की सगळ्या मुलांना (बहुतेक दुसरीतली असावीत) या गोष्टीचा अत्यंत हेवा वाटायचा. मी तेव्हा चार वर्षाचा असावा.
मला आठवतं की माझा एक कोरडे नावाचा फ़ार चांगला मित्र होता. आम्ही नेहमी बरोबर खेळायचो. मी एकदा त्याला झोपळ्यावरून पाडले. त्यानंतर आमची मैत्री संपली.
एकूण माझ्या लहानपणच्या आठवणी फ़ारच चांगल्या आहेत. मला काही वाईट अनुभव आठवत नाहीत. माझ्या सर्व अनुभव, आठवणी सगळ्या आनंदाच्या आणि मजेच्याच आहेत.
मला असं नेहमी वाटतं, माझ्या मुलींना मोठं झाल्यावर असंच वाटेल का ?

मला असं नेहमी वाटतं की आपल्या मुलांचं आयुष्य आपल्य़ापेक्षा चांगलं जावं. आणि माझ्य़ा आई-वडिलांनी ते तसं केलं.

एक ठळक आठवण

माझी सगळ्यात ठळक आठवण आहे मी पाच वर्षाचा असतानाची. मला शाळा मुळीच आवडायची नाही. एकतर माझ्या घराच्या आजूबाजूला मला बरेच मजेदार मित्र-मैत्रिणी होत्या. आणि मला काही दिवसातच लक्षात आले की त्यांच्या शाळा माझ्या शाळेपेक्षा लवकर सुटतात. मी लवकर जातो आणि ऊशीरा घरी येतो. मी दूरच्या शाळेत जातो. या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनाला फ़ारच त्रास होऊ लागला. आणि एक दिवस मला आमचा खेळ मधेच सोडून शाळेत जावे लागले.
मला न्यायला त्यावेळी सायकल रिक्षा यायचा. घरापासून निघाल्यावर जवळ जवळ एक किलोमीटर चढाव होता. त्यामुळे रिक्षावाला रिक्षा हळूहळू पायी ओढायचा. त्या दिवशी, मी रिक्षातून ऊडी मारली आणि पळत पळत घरी आलो. त्या दिवशी अर्थातच सुटि मिळली.
माझ्या शाळेचे नाव होते माऊंट कारमेल कॉन्व्हेंट.

आपण आपल्या मुलांना काय देतो ?

संस्कार ? शिक्षण ? पैसे ?
नाही. यातील काहिही नाही. आपण देऊ शकतो त्या केवळ आठवणी.
तुम्ही विचार करा. मोठे झाल्यावर तुम्हाला लहान्पणचे काय आठवते ? काय जाणवते ?
आपल्याजवळ आहेत त्या केवळ आठवणी. आपल्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी आपल्याबरोबर घालवलेल्या काही क्षणांचे अनुभव.
तुम्हाला काय आठवते ? तुमच्या बाबांनी रागावलेले - घरात आल्यावर तुम्ही हात-पाय धुतले नाहीत म्हणून ?
तुम्हाला काय वाटले तेव्हा? मी हात-पाय धुणारच होतो, जरा ही ईथे काय मजा आहे ती पाहू तर द्या.
आता तुम्ही तुमच्या मुलांना ती बाहेरून आल्यावर काय आणि कसे सांगता?
तुम्ही हा विचार करता का - की मी आता काय म्हणायला पाहिजे म्हणजे माझ्या मुलाच्या मनात माझ्याविषयी एक चांगली आठवण राहील ?
हा हा हा !
एव्हढा विचार करंत राहीलो तर ही रागवायची सुवर्ण(!)संधी हातातून जायची!
मला असं वाटतं की मुलांना चांगल्या वागणुकीचे कारण समजावून सांगितले तर ते जास्तं नीट लक्षात राह्ते.
माझ्या काही प्रिय आठवणी अत्यंत साध्या आहेत. कोणी कधी पाठीवरून फ़िरवलेला हात, कोणी कधी मला दिलेले थोडे जास्त आईस्क्रिम वगैरे.
या आठवणी आपल्या मनात अत्यंत ताज्या असंतात. पण त्याचवेळी आपल्या वडिलांनी समोर बसवून एक तास केलेला सदुपदेश दुसर्याच मिनीटाला विसरलेला असतो.

Thursday, July 12, 2007

कादंबरीमय शिवकाल

कादंबरीमय शिवकाल - सध्या मी हे पुस्तक वाचतो आहे. श्री. गो. नि. दाण्डेकरांनी त्यात शिवाजी महाराजांच्या काळच्या सामाजिक परीस्थितीचे अत्यंत छान वर्णन केले आहे.
किती साधी माणसे! किती कठिण परिस्थितीत त्यांचे जीवन गेले. साधे दोन वेळचे जेवण ही देखिल तेव्हा एक आनंद मानावयाची गोष्ट होती. कारण सकाळी बाहेर पडलेला माणूस सन्ध्याकाळी परत येईल याची काहीच खात्री नव्हती.
या परिस्थितीत महाराजांनी केव्ह्ढा बदल घडवून आणला.
आणि गो. नि. दाण्डेकरांनी हे विश्व इतके जिवंत केले आहे, की असे वाटते की आता सिंह्गडावर गेलो तर तिथल्या चौकीवर आपल्याला अडवून विचारतील, "कुठं निघाला पाव्हणं?"
हे कर्तुत्व अजून महाराष्ट्राबाहेर माहिती नाही. जगभरची गोष्टच सोडा.
किंबहुना आपण आपल्या मुलांना तरी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतो आहोत का?

शाळांमधून गो. नि. दाण्डेकरांची पुस्तके का नाहीत ?
सारा इतिहास सनावळ्यांमधे गुंतून पडला आहे.

Wednesday, July 11, 2007

झुळुक हळुच येते आणि म्हणता म्हणता गेलेलीही असते.
विचारांचेही काही असेच. ते विचार पकडून त्यांना योग्य अशा शब्दांत पकडून ब्लॉगमधे टाकायचे म्हणजे जिकिरिचेच काम.
पण मराठीतून लिहिण्याचे समाधान काही वेगळेच.
मी बरेच ब्लॉग पाहिले - मराठीतून लिहिलेले. फ़ार छान वाटले.

आपले विचार - आपले संस्कार

मला मराठीतून लिहिता येईल का ?
हा मुख्य प्रश्न नाही। मुख्य प्रश्न असा आहे की मला काही लिहायचे आहे का ? मनातले विचार कागदावर मांडायचे आहेत का.... हा खरा प्रश्न आहे. आपले विचार पुढे जात आहेत का ? आपण जो विचार करतो, तो आपल्या पूर्वजांकडून आणि आपल्या अनुभवावरून...
आपले अनुभव मर्यादित असतात. कारण ते असतात केवळ काही वर्षांचे, काही दिवसांचे. आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे जे संस्कार आलेले आहेत, ते आपल्या विचारांत प्रकट होतात. काही संस्कार आपण आपल्या मित्रांकडून घेतो.
कूठले संस्कार प्रबळ ठरतील ते ठरविणे जरा कठीणच. पण आपल्या आई-वडिलांनी आपल्या मनात जरूर सुविचार घातले असतील. म्हणूनच आपण इथपर्यंत पोचलो आहोत.
आता आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो आहोत हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे.
हा प्रश्न आपण आपली मुले लहान असतानच विचारायचा आहे. हा प्रश्न पुढच्या पिढीने आपल्याला विचारू नये असे वाटत असेल तर.